अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे चर्चेत आली असून तिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं. अंकिताने मुलाखतीदरम्यान तिनं घर सोडून जाण्याचा निर्णय का घेतलेला याबद्दल खुलासा केला होता.
अंकिता म्हणालेली की, 'मी जेव्हा वयाने ११ वर्षे मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात होते, तेव्हा एक क्षण असा आला ज्यावेळी मला माझ्या घरच्यांचा खूप राग आला. त्यांचा कंटाळा आलेला तेव्हा मी त्याला भेटले आणि आपण लग्न करूया असं म्हणाले. त्याचवेळी माझ्या आईला कुणीतरी सांगितलं की, अंकिताने लग्न केलं.'
'त्यावेळी मी लग्न केलंच नव्हतं पण माझ्या भावाच्या एक्स गर्लफ्रेंडने ही अफवा सगळीकडे पसरवली. माझी आई मला शोधत तिथे येणार म्हणून मी त्या मुलाच्या घरी जाऊन राहिले. कारण मी तेव्हा १८ वर्षांची झाले होते आणि मला काय करायचं ते मी करू शकते असा त्यावेळी आत्मविश्वास होता. मी आंधळ्या प्रेमात होते त्यामुळे आईवडिलांची मला अजिबातच किंमत नव्हती.'
'मुलाचा जॉब मुंबईत असल्यामुळे त्याला तिथे जावं लागलं होतं. पण मी त्याच्याच घरी राहून माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. सहा सात महिने मी तिथे राहिले प,ण आता त्या कृत्याची जाणीव मला होतेय की आईबाबांना त्यावेळी काय वाटत होतं. या सगळ्यात माझं त्या मुलाशी लग्न होईल किंवा नाही ती गोष्ट वेगळी होती पण त्याची आई मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यांनी माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला होता. पण दीड महिन्यातच मला जाणीव झाली की, प्रेम बिम काही नसतं, आईवडीलच सर्वस्व असतात.'
'पण त्यानंतर परत कसं जायचं म्हणून माझ्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. माझ्या बाबतीत सगळ्यांना माहीत झालं होतं. त्यामुळे त्या चार लोकांना मी कुठल्या तोंडाने उत्तर देणार असे प्रश्न मनात येत होते. एक-दीड वर्ष गेले त्यात मी शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला.'
'तू काहीच करू शकणार नाहीस, तुला इंजिनिअरिंगला सुद्धा कमी मार्क्स मिळालेत. तू फक्त भांडीच घासशील असं जेव्हा लाईफ पार्टनरच आपल्याबद्दल बोलायला लागतो तेव्हा तुम्ही डिमोटिव्हेट होता आणि तेच माझ्याबाबतीत सतत होत राहिलं. पण मी एक म्हणेन की माझं त्याच्यासोबत लग्न जरी झालं नव्हतं तरी ती माझी सासूच होती, तिने मला प्रेरणा दिली. ती माझ्यासाठी आईच होती.'
'पण दोन वर्षानंतर सतत त्याच त्याच गोष्टी पाहून मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. तो मुलगा छान वागेल माझ्यासोबत, हा विचार यायचा पण तसं मुळीच घडत नव्हतं. शेवटी आईवडील आपल्याला पुन्हा घरात घेतील की नाही ही धाकधूक होती, पण आई वडिलांनी मला समजावून घेतलं. दोन वर्षानंतर त्यांना कळलं की, मी त्या मुलाशी लग्न केलं नव्हतं'