सध्या पावसाळा सुरु झाला असून, या हंगामात प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळीजी घेणे गरजेचे असल्याचे सर्पमित्र विवेक केणी यांनी सांगितले आहे. तर पावसाळी हंगामात सापांपासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन 'वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था' या संस्थेकडून करण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील सारडे गावातील ७० वर्षीय महिलेने आपल्या घरात काहीतरी टोचले असल्याची तक्रार केली होती. मात्र कोणतीच लक्षणे अथवा खुणा दिसत नसल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर त्रास होण्यास सुरुवात झाली असता, रुग्णालायात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. तिला अतिविषारी मण्यार सापाचा दंश झाला असल्याचे निदान करण्यात आले आहे.
आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेला सर्पदंश झाला. काहीतरी टोचले असा तिला भास देखील झाला. मात्र काही टोचल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. तर काही चावल्याची लक्षणे देखील दिसत नव्हती. याकडे दुर्लक्ष करून, पुन्हा नित्य कामाला सुरुवात झाली. बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. मात्र काही तासांनंतर तोंडातून लाळ येणे आणि डोळ्यावर तीव्र झापड येण्यास सुरुवात झाली. यावेळी सदर महिलेस तात्काळ रुग्णालायात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्णालायात पोहोचेपर्यंत महिला मयत झाली होती.
तपासणी केल्यानंतर महिलेला अतिविषारी 'मण्यार' सापाचा दंश झाल्याचे निदान झाले. मण्यार सापाचे दात बारीक असल्याने अनेकदा दंश झाल्याचे लक्षात येत नाही. तर खुणाही दिसत नाही. त्यातच एखाद्या पिल्लाने दंश केल्यास असे प्रकार नक्कीच होऊ शकतात असे तज्ञान्नी नमूद केले आहे.
सध्या पावसाळा सुरु झाला असून, या हंगामात प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळीजी घेणे गरजेचे असल्याचे सर्पमित्र विवेक केणी यांनी सांगितले आहे. यामध्ये शक्यतो जमिनीवर झोपणे टाळावे. पर्याय नसल्यास मच्छरदाणी लावून त्याच्या आत झोपावे, घरात स्वच्छता असावी, अंधारात अडगळीत काम करू नये, काही टोचल्याचा भास झाल्यास वाट न बघता दावाखान्याचा मार्ग पकडवा असे अनेक सल्ले दिले आहेत.
पावसाळी हंगामात सर्पदंशाच्या घटना पहायला मिळतात. दंश झाल्यास अथवा टोचल्यासारखे वाटल्यास तात्काळ दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे योग्य ठरते.
सर्पदंश झाला तर अशा वेळी खासगी रुग्णालायात न जाता आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालायात जाऊन उपचार घ्यावा. शासकीय रुग्णालायात सर्पदंशवरील इंजेक्शन उपलब्ध असतात. प्रशासन देखील सर्पदंशवरील मृत्युंचा दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.